प्रतिकांचे कालपरत्त्वे संदर्भ बदलतात, हे मान्य करण्यास काहीही हरकत नाही. काळाबरोबर देशाचे नकाशेही बदलतात म्हणून देशाभिमानाची गरजच नाही, असं आपण म्हणू शकतो काय?...तर नाही. असीम त्रिवेंदींची व्यंगचित्रे ही देशद्रोही होती, असं मीही म्हणणार नाही, मात्र त्यातील अनेक चित्रे ही असभ्य आणि राष्ट्रीय प्रतिकांची अवहेलना करणारी होती हे मान्य करावेच लागेल. “मै भी अण्णा”च्या रुपानं ज्या टोपीचा वापर चळवळीनं केला त्यावरचं ब्रीदही “मै भी अरविंद” व्हायला वेळ लागला नाही. त्यामुळे चळवळीच्या बदलत्या आस्था आणि अस्मिता या किती स्थलकाल आणि व्यक्तीसापेक्ष आहेत हे त्यावरून सिध्द होतंच. ज्या भारतमातेच्या प्रतिकाचा वापर करुन आंदोलन पेटवण्याचा पर्यत्न झाला, त्याच प्रतिमेचं असभ्य व्यंगचित्र हा युगधर्म नव्हे तर चळवळीतील कार्यकर्त्यांची वैचारीक अपरिपक्वता आहे.
हिंदू देवदेवतांची व्यंगचित्रे रेखाटल्यानं अस्वस्थ झालेले मोहंमद पैगंमबरांच्या व्यंगचित्रानंतर भारताचा या व्यंगचित्रांशी काहीही संबंध नसूनही दंगा भडकावणारे आणि 50 वर्षांपूर्वी बाबासाहेबांवर काढलेल्या चित्रावरुन अस्मितेचा प्रश्न करणा-या अनेकांना भ्रष्टाचारविरोधी लढ्यातवापरल्या गेलेल्या असीम त्रिवेदींच्या व्यंगचित्रांमधे अभिव्यक्ती दिसू लागली. कारण या व्यंगचित्रांमध्ये विटंबना करण्यात आलेली प्रतिकं ही त्यांच्या समाजाशी, धर्माशी आणि मतदारांच्या मतांशी निगडीत अशी नाहीत. ही प्रतिकं आहेत ती भारतीयत्वाची...
असीम त्रिवेदींनी काढलेल्या व्यंगचित्रांना अभिरुची संपन्न, अभिव्यक्तीच्या कक्षेत बसणारी म्हणायची का? हा प्रत्येक सुज्ञ माणसासमोरचा प्रश्न आहे. तरी रामराज्याची आणि नवनिर्माणाची भाषा करणा-या आणि स्वत: कलाकार असलेल्या काही राजकीय पुढा-यांनी असीमवरील कायदेशीर कारवाई ही कशी बेकायदेशिर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला आणि नकोत्याही वादातून प्रसिध्दी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्नही. (या नेत्यांनी असीमनं रेखाटलेली व्यंग्यचित्रे नजरे खालून घातली नसावीत असं आजही मी समजतो) असीमवरचा देशद्रोहाचा खटला हा सरकार आणि मुंबई पोलिसांचा आततायीपणा असला तरी राष्ट्रीय प्रतिकं कायद्याअंतर्गत असीम यांची व्यंगचित्रे ही गुन्हा ठरु शकतात आणि त्याअंतर्गत असीम यांना 2 वर्षांची शिक्षा आणि 20 हजाराचा दंडही होऊ शकतो.
व्यंगचित्रे हा मूळ शब्द व्यंग्य आणि चित्र या दोन शंब्दांचा मिळून बनलेला आहे. यात व्यंग नव्हे तर व्यंग्य असा शब्दाचा वापर आहे. व्यंग्य म्हणजे शारीरिक व्यंग नव्हे तर शाब्दिक चेष्टा, विनोद या अर्थानं हा शब्दाचा वापर केला जातो. असीमची काही चित्रे ही अभिरुचीहीन आणि अश्लिल स्वरुपाची आहेत. एका चित्रात असीमनं दोन नग्न पुतळे नकोत्या अवस्थेत दाखवून भ्रष्टाचार आणि राजकारण्यांची उपमा या पुतळ्यांना दिली आहे. ही कसली अभिव्यक्ती हा तर टूकार, बौध्दिक भिकारपणाच. या व्यंगचित्रांना व्यंगचित्रे म्हणूनही मान्यता द्यावी का हाच मुळ प्रश्न ? कॉलेज किंवा सार्वजनिक शौच्यालयात काढलेल्या चित्रांना जर कुणाला कलेची , अभिव्यक्तीची उपमा द्यायची असेल तर त्यांनी खुशाल द्यावी मात्र त्यातून अपल्या अभिरुचीची जाण आपण समाजाला करुन देत असल्याची त्यांनी जाणीव ठेवावी .
राजकारणी लोकशाहीचे धिंडवडे काढतात मग असीमनं आपला उद्वेग या चित्रांमधून व्यक्त केला तर त्यात काय चुकलं, अशा पध्दतीनं समर्थन करणारेही अनेक आहेत. मात्र चुकीच्या गोष्टींचं, कृतीचं चुकीचे संदर्भ देऊन समर्थन होऊ शकत नाही. राजकारण्यांनी पातळी सोडली म्हणून व्यंगचित्रकारांनी (पत्रकारांनी) त्याच पातळीवर जाण्याची गरज आहे का ?
सविधांनाचा करण्यात आलेला अवमान, राष्ट्रीय चिन्हांचा करण्यात आलेला अवमान लक्षात घेता अभिव्यक्तीच्या या हिन प्रकाराला इथेच आळा घालण्याची गरज आहे. अन्यथा राजकीय, सामाजिक जाणीव नसलेले आणि नाक्यावर बसून अश्लिल गप्पा मारणारेही उद्या साहित्यिक असल्याचा आव आणतील.
असीमनं काढेलेली काही चित्रे चांगली असतीलही. मात्र ज्या चित्रांवरुन वाद निर्माण झाला आहे, ती चित्रे जर उद्या समाजात पसरली तर त्यातून दंगली उसळण्याचीच शक्यता जास्त आहे.असीमची ही वादग्रस्त चित्रे म्हणजे अभिव्यक्तीतील भ्रष्टाचार असंच म्हणावं लागेल.
अभिव्यक्तीच्या नावावर स्वैराचाराला मान्यता देता येणार नाही. अन्यथा फेसबुक, ट्युटरसारख्या सोशलमीडीयातून याचा प्रचार व्हायला काही तासही लागणार नाहीत आणि त्यातून पुढची पिढीही अभिव्यक्तीचा अर्थच अश्लिलता असा लावेल.
हिंदू देवदेवतांची विटंबना आणि पैगंमबराचं व्यंगचित्र करणा-यांना जीवे मारण्याची धमकी देणा-यांनी थोडातरी देशाभिमान जागृत ठेवावा आणि
भारतीयत्वाची प्रतिकं असलेल्या चिंन्हाची झालेली ही विटंबना राजकीय फायद्यासाठी न वापरता सारासार विचार करून भूमिका ठरवावी. अन्यथा डेव्हीड लो, आर. के. लक्ष्मण, दलाल, बाळासाहेब यांचा व्यंगचित्रांकारितेचा वसा पुढे नेणारा येत्या काळात एकही होणार नाही.
राष्ट्रीयत्वाची प्रतिकं ही देश एकसंध ठेवण्यासाठी, वैचारीक बैठकीला बळ देण्यासाठी महत्वाची असतात. देशभक्तीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या भ्रष्टाचाराविरूध्दच्या चळवळीला जर या देशाला अराजतेकडे लोटायचं नसेल आणि भारतीय लोकशाहीत निर्माण झालेल्या उणीवा दुर करायच्या असतील तर चळवळीनं राष्ट्रीय प्रतिकांची भारतीयांच्या मनातील प्रतिमा डागाळणार नाही याची काळजी घ्यायला हवी. अन्यथा या देशाच्या नकाशाची प्रतिमा बदलायला वेळ लागणार नाही. कारण देशाभिमान नसलेले भ्रष्ट मानसिकतेकडे वळण्याचीच जास्त शक्यता असते. देशाच्या सीमेवर रक्षाणासाठी उभे असलेले जवान याच प्रतिकांना स्मरून जीवाची बाजी लावत असतात. म्हणून जर हा देश टिकला, ही राष्ट्रीय प्रतिकं टीकली तरचं या लोकशाहीला पारदर्शक करण्याची स्वप्नं आपण पाहू शकू.
निलेश खरे